लोकशाहीची तत्त्वे अजून रूजण्याची गरज...

लोकशाहीची तत्त्वे अजून रूजण्याची गरज...

शिक्षण विवेक    07-Nov-2023
Total Views |

लोकशाहीची तत्त्वे अजून रूजण्याची गरज...
आपल्या देशाला स्वतंत्र होऊन आज ७४ वर्षे झाली आणि लोकशाही स्थापन होऊन ७१ वर्षे झाली. दरम्यानच्या काळात आपल्या स्वतंत्र गणतंत्र असलेल्या देशाला चांगले-वाईट अनेक चढउतार पाहावे लागले आहेत. एका स्वतंत्र गणतंत्र देशाने करावे तेवढे कार्यकर्तृत्वही पार पाडले आहे. एका महासत्ताक देशाच्या दिशेला मार्गक्रमण करण्याचा उत्तम प्ररत्नही झाले आहेत, होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळातील लोकशाहीच्या मार्गातील अडथळा ठरत असलेली संस्थाने प्रजासत्ताक देशाच्या अंमलाखाली आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांना अनेक प्ररत्न करावे लागले. सरदारांच्या मनातील श्रेष्ठ भारत निर्माण होण्यासाठी स्वातंत्यानंतरही देशवासीयांना मुक्ती लढाया लढाव्या लागल्या. जम्मू-काश्मीरचा मुद्दा आता तीन राज्यात विभागल्यानंतर शांत झाला असला तरी त्यासाठी देशाला मात्र खूप काही सोसावे लागले आहे. जम्मू-काश्मीर वगळून संपूर्ण देशात दाही दिशांना फफडकरणाऱ्या  तिरंग्याला किती काळ प्रतीक्षेत राहावे लागले, याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. कला, क्रीडा, साहित्य, संरक्षण, कृषी, औद्योगिकसारख्या हर एक विभागात प्रगतीचे पाऊल उमटलेले आहेतच. लोकशाही तत्त्वे भारतीरांच्या मनात पूर्ण उतरली आहेत की नाही यापेक्षा इथल्या एकतेचा गौरव संपूर्ण जगात होतो, हे काही कमी महत्त्वाचे नाही! कधी पाकिस्तान तर कधी चीनच्या कुरापती आपण सहन करतोच आहोत. आजतागायत अनेक भूमिपुत्र दहशतवादी कारवायांना बळी पडले, शहीद झाले. परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक मात्र शत्रूंच्या मेंदूला चांगलाच झोंबला आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्या देशाचा इंच भागही आपल्यासाठी किती मोलाचा आहे हे वारंवार दर्शवून झाले आहे. संरक्षण विभागातील झालेले आमूलाग्र बदल देश सुरक्षित असल्याची सदैवच ग्वाही देतात हे अचूकपणे लक्षात येतेच येते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील काही ताजी उदाहरणे पाहता प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या महान भारताची अचूक ओळख होते. परवाच भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे स्वप्न धुळीस मिळवून ‘हम कुछ कम नहीं’ हे सिद्ध करून दाखवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टिचर’ अवॉर्ड जिंकणाऱ्या डिसले गुरूजींनी देशाची शैक्षणिक मान उंचावली आहे. कोरोनाचा कहर संपूर्ण जगाने झेलले आहे, पण म्हटले जाते की अवाढव्य लोकसंख्या असणाऱ्या भारताने प्रगत राष्ट्रापेक्षाही कितीतरी अधिक पटीने यशस्वीरीत्या कोरोना वॉर लढून दाखवलेले आहे. यांसारखी अनेक उदाहरणे प्रगतीचे द्योतक ठरत आहेत. बऱ्याच क्षेत्रातील वानवाही विसरून चालणार नाही. खूप मोठी जनसंख्या असल्याने भूकबळी, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, बेरोजगारी, बलात्कार, खून-दरोडे, महामारी, शेतीविषयक अनेक समस्या अजूनही आ वासून आहेत. मात्र यासाठी केवळ शासनच जबाबदार आहे असे म्हणून चालणार नाही. ‘मेरा भारत महान’ म्हणणाऱ्या प्रत्येक देशवासीयांच्या धमण्यामध्ये लोकशाहीची तत्त्वे रूजली पाहिजेत, तेव्हा कुठे आपल्या प्रजासत्ताक देशाला आणखी चांगली प्रगती साधता येईल.
- आनंद घोडके, पालक,
कै.वि.मो.मेहता प्रशाला, जुळे सोलापूर