बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, कॉपी टाळण्यासाठी बोर्डाकडून कडक बंदोबस्त!

राज्यातील १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार ; परीक्षेसाठी राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रे तयार

शिक्षण विवेक    11-Feb-2025
Total Views |

बारावी परीक्षा

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. राज्यातील १५ लाख हजार ३७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यातील हजार ३७३ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यंदा परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने काही कठोर निर्णयही घेतले आहेत.

विद्यार्थ्यांवर करडी नजर-

बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी जीपीएसद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड खराब असणाऱ्या काही संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे.

विभागीय मंडळाद्वारे होणार परीक्षा-

राज्यातील बारावीची परीक्षा ही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी कोणत्याही परीक्षा केंद्रावर कधीही धाड टाकू शकतात. या धाडीत एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना-

परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रकरण केले जाणार. तसेच राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांपासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. यानंतरही परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.