सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या युगामध्येसुद्धा वाचनाचे स्थान अबाधित आहे, याचे कारण पूर्वापार चालत असलेली आपली ग्रंथसंपदा.
समर्थ रामदासांचा वाचनावर खूप भर होता. त्यांनी असे म्हटलेलेच आहे की, ‘लेखन व वाचन हा विद्यार्थी जीवनाचा आत्मा आहे.’ म्हणूनच विद्यार्थीदशेपासूनच वाचन संस्कार रुजावा यासाठी वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे. मग ते का करावे याचे महत्त्व आपण जाणून घेऊ या.
* वाचनाने अक्षर ओळख होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना धडे वाचणे सोपे जाते.
* वाचनामुळे मेंदूचा व्यायाम होतो. त्यामुळे बुद्धी तल्लख होते.
* वाचनाने एकाग्रता वाढते. जर सातत्याने वाचन केले तर आपल्यामधील आत्मविश्वास वाढतो.
* वाचनामुळे आपल्या सभोवताली काय घडते याची माहिती मिळते. थोरांचे चरित्र वाचून त्यांचे अनुभव आदर्श ठरतात.
* भाषेवर प्रभुत्व निर्माण होते. उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात.
* कल्पनाशक्ती वाढते.
* वाचनाने आपली करमणूकसुद्धा होते. आनंद मिळतो.
* वाचनाने डोळ्यावर येणारा ताण हा टि.व्ही. व कमप्युटरकडे बघून येणार्या ताणापेक्षा खूपच कमी असतो.
म्हणूनच वाचन व ग्रंथाबद्दल संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेच आहे की,
मार्ग दाखवणारे उपयुक्त आनंददायी जीवन
प्रगती पंथावर नेतात होईल जीवनाची उन्नती
ज्ञान विज्ञानाची प्रगती ऐसीच असावी ग्रंथ संपत्ती.
ग्रंथ संपत्ती आपल्या समोर असल्यावर वाचन तर व्हायलाच हवे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो/मित्रीणींनो आज आपण वाचनासाठी एक प्रतिज्ञा घेऊयात.
वाचन हा देखील आमचा श्वास आहे.
ग्रंथसंग्रह आमुचा ध्यास आहे.
सारे उत्तम ग्रंथ आमचे गुरू अन आमचे मित्र आहेत.
मातृभाषेवर आमचे प्रेम आहे. मराठी भाषेच्या समृद्ध अन् विविधतेने नटलेल्या साहित्य परंपरांचा आम्हाला सार्थ
अभिमान आहे. त्या परंपरांचा वाचक अन् पाईक होण्याची पात्रता अंगी येण्यासाठी आम्ही सदैव आस्वादक वाचक होऊ.
जय लेखन! जय वाचन! जय मायबोली!
चला तर मग नवीन वर्षाचा संकल्प करु या! भरपूर वाचन करू या!
- गायत्री जवळगीकर, ग्रंथपाल
म.ए.सो. मुलांचे विद्यालय