‌‘महाराष्ट्राचा राज्य वृक्ष‌’

शिक्षण विवेक    18-Jun-2024
Total Views |


‌‘महाराष्ट्राचा राज्य वृक्ष‌’ 

  मुलांनो, तुमचा लाडका महिना कोणता? असे विचारले की तुम्ही लगेच उत्तर द्याल - मे महिना! खरं ना? कडक उन्हाळा असला तरी परीक्षा संपून शाळेला सुट्टी लागल्यामुळे मे महिना म्हणजे नुसती धमाल आणि मजाच मजा! आईस्क्रीम, जेली असे थंडगार पदार्थ व आवडता खाऊ खाणे, मनसोक्त हिंडणे-फिरणे आणि खेळ खेळत दंगामस्ती करणे ही सर्व गंमत याच सुट्टीच्या महिन्यात करायला मिळते.

दर वर्षीप्रमाणे गेल्या मे महिन्यात तुम्ही खूप आंबे खाल्ले असतील, जेवणात आमरसावर मस्तपैकी ताव मारला असेल, आईने घरी आंब्याचा मिल्कशेक, बर्फी किंवा आईस्क्रीम तयार करून दिले असेल. तर सर्वांना आवडणाऱ्या आंबा ह्या फळझाडाची राज्य सरकारने ‌‘महाराष्ट्राचा राज्य वृक्ष‌’ म्हणून निवड केली आहे. आज येथे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य वृक्षाबद्दल म्हणजे आंब्याच्या झाडाबद्दल आपण माहिती करून घेऊ या.

महाराष्ट्रामध्ये आंब्याची झाडे भरपूर प्रमाणात सापडतात. जंगलात, दऱ्याखोऱ्यात, डोंगरांवर रानटी म्हणजेच रायवळ आंब्याची झाडे नैसर्गिकरित्या उगवलेली आढळतात. तसेच गावांमधील शेतांमध्ये व शहरांमधील टेकड्यांवर देखील अशी रानटी आंब्याची झाडे खूप दिसून येतात. याशिवाय कलमी आंब्याच्या बागा म्हणजेच आमराया देखील महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्रातील कोकण विभागात दिसून येतात. या आमरायांमध्ये जून या पावसाळी महिन्यात मोर पक्षी सुंदर पिसारा फुलवून नाच करताना दिसून येतात. कोकणातील रत्नागिरी, देवगड येथील हापूस हा तर अत्यंत लोकप्रिय आंबा आहे. कोकणातून फळांचा राजा आंबा हा महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये व भारतामधील इतर राज्यांत तसेच जगभरातील देशांमध्ये विक्रीकरता पाठवला जातो.

आंब्याच्या झाडाला भरपूर हिरवीगार पाने येतात. ही पाने हिंदू धर्मात शुभ समजली जातात. त्यामुळे आंब्याच्या पानांची तोरणे करून सणाच्या दिवशी आणि लग्न, मुंज यांसारख्या शुभ कार्यात दारावर लावली जातात; तर पूजेच्या कलशात नारळाबरोबर आंब्याची पाने किंवा त्याच्या डहाळ्या ठेवल्या जातात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या झाडाला मोहोर येण्यास सुरुवात होते आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात कैऱ्या येऊन एप्रिल-मे महिन्यांमध्ये त्या कैऱ्यांचे पिकलेले आंबे तयार होतात. केशरट पिवळ्या रंगाचा आंबा हा चवीला अमृतासारखा मधुर तर असतोच; शिवाय आंबा हा अत्यंत आरोग्यदायी असून या फळात अ, , , , के ही जीवनसत्त्वे, फायबर आणि लोह, कॉपर, पोटॅशियम, झिंक ही खनिजद्रव्ये असतात. आंब्याच्या झाडावर कावळा, कोकिळा असे खूप पक्षी घरटी करताना दिसून येतात. झाडावर फळे तयार झाल्यावर पिकलेले आंबे खायला बुलबुल, पोपट असे अनेक पक्षी येतात; शिवाय खारुताई, वानरे, वटवाघळे असे प्राणीदेखील ते पक्व आंबे खायला येतात. अशा ह्या सर्वांच्या लाडक्या फळांच्या राजास ‌‘भारत देशाचे राष्ट्रीय फळ‌’ म्हणून भारत सरकारने घोषित केलेले आहे.

मे महिन्यात हापूस, पायरी, रायवळ असे आंबे बाजारात मिळतात, तर जून या पावसाळी महिन्यात तोतापुरी, दशेरा, केसर, लंगडा हे आंबे मिळतात. जून महिन्यात मुसळधार पाऊस पडतो आणि आधीच सदाहरित असलेले आंब्याचे झाड पावसामुळे तजेलदार, डेरेदार व हिरवेगार दिसू लागते.

तुम्हाला आंब्याची झाडे महाराष्ट्र राज्यात कुठे कुठे दिसली? त्यावर कोणकोणत्या पक्ष्यांची घरटी आढळली? कोणकोणते प्राणी-पक्षी-माश्या-फुलपाखरू दिसले? अशा गोष्टींच्या तुमच्या निसर्ग वहीत नोंदी करा. आपल्या आंबा या राज्य वृक्षाबद्दल आणि राष्ट्रीय फळाबद्दल आणखी माहिती गोळा करून ती माहिती तुमच्या वहीत सुवाच्य अक्षरात लिहून ठेवा. आंब्याचे झाड, मोहोर, फळ, पाने यांची वहीत चित्रे काढा किंवा जुन्या मासिकातून, वर्तमानपत्रातून अशी चित्रे कापून त्या वहीत चिकटवा. अशी एक खास निसर्ग वही अथवा डायरी तुम्ही तयार करा. त्यात तुम्हाला आवडतील त्या झाडांची, पाने-फुले-फळांची, पशुपक्ष्यांची माहिती चित्रांसहित नोंद करून ठेवता येईल.

बरं, आंबे खाल्ल्यानंतर आंब्याच्या कोयी कचरापेटीत टाकून देऊ नका. प्रत्येक कोय घरातील दुधाच्या रिकाम्या पिशवीत, वेफर्स वगैरे खाऊन झाल्यानंतर उरणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्यामध्ये माती किंवा घरी बनवलेले ओल्या कचऱ्याचे खत घाला. त्या पिशवीत रोज थोडे थोडे पाणी घालत जा. काही दिवसांतच त्या पेरलेल्या कोयीतून कोंब उगवेल व तो मोठा होत जाऊन काही दिवसांतच त्याचे सुंदरसे रोप तयार होईल. अशी तुम्ही रोपे तयार करून बघा. ती आंब्याची रोपे लागवड करण्याएवढी मोठी झाल्यावर जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाखाली शहर किंवा गावातील टेकड्यांवर, मोकळ्या जागी नेऊन तिथे ती जमिनीत लावा. ती रोपे तिथे नीट वाढेपर्यंत जरुरी पुरते पाणी घालून त्यांची योग्य ती काळजी घ्या. झाडे ही पृथ्वीवरील महत्त्वाची निसर्ग संपत्ती आहे ही गोष्ट तुम्ही सदैव ध्यानात ठेवा.

- प्रिया फुलंब्रीकर