१ मे २०२५ महाराष्ट्र दिन व छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्था सभागृहात "स्पंदन "या विशेष साहित्य अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. नंदकिशोर जोशी सर, उपाध्यक्ष प्राध्यापक नारायण फडके सर,उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास दातार सर,कार्याध्यक्ष श्री श्रीकांत तरटे सर, संस्थेचे चिटणीस डॉ. निलेश रेवगडे सर,चिटणीस सौ.मिनाक्षी गागरे मॅडम तसेच कार्यकारणी मंडळ सदस्य श्री. मिलिंद कुलकर्णी सर,श्री पालकर सर तसेच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉ. अरुंधती जोशी मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चिटणीस डॉ. निलेश रेवगडे सर यांनी केले. आपल्या मनोगतातून त्यांनी प्रत्येकाने लिहावे,समाजासाठी लिहावे व त्यास तंत्रज्ञानाचाही उपयोग करावा असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषदेच्या आधारस्तंभ साहित्यिक मा. डॉ.अरुंधती जोशी मॅडम यांच्या हस्ते व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पंदन या विशेष अंकाचे प्रकाशन झाले . डॉ. जोशी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून स्पंदन ही जिवंतपणाची खूण आहे त्यामुळे आपली लेखणी सतत प्रवाही असली पाहिजे तसेच छत्रपती शिक्षण मंडळाने शिक्षकांना लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी दिलेले व्यासपीठ हे खरोखरच प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.स्पंदन या विशेष अंकात संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लिहिलेल्या शैक्षणिक, सामाजिक,अनुभवाआधारित व मूल्याधिष्ठित लेखन रचना समाविष्ट आहे. शिक्षक लेखकांपैकी विवेकानंद संकुल सानपाडा शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस मॅडम,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. वावळ सर तसेच संस्था N E P समन्वयक मांडा टिटवाळा शाळेतील शिक्षिका सौ उर्मिला जाधव मॅडम, सौ . अर्पिता कानिटकर मॅडम तसेच विक्रमगड हायस्कूलच्या शिक्षिका सौ.रूपाली जोशी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नंदकिशोर जोशी सरांच्या हस्ते सर्व शिक्षक लेखकांचे गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. नंदकिशोर जोशी सरांनी स्पंदन या अंकाच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा घेतला बोलीभाषेचे महत्त्व ,समाज परिवर्तनासाठी साहित्याचे लेखन करणे आवश्यक आहे याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले.आपल्या कलागुणांना व्यक्त करता आलं पाहिजे असे मत व्यक्त केले. छत्रपती शिक्षण मंडळाने प्रकाशित केलेले स्पंदन हे परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेले साहित्य पुष्प असून जे समाजात सुगंध पसरवत राहील अशा भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या शिक्षिका सौ.हर्षला गावित मॅडम यांनी केले. विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेच्या शिक्षिका सौ. सायली कुलकर्णी मॅडम यांनी शारदा स्तवन सादर केले. नूतन विद्यालयाच्या शिक्षिका सौ.शुभांगी भोसले मॅडम यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.