
२६ जानेवारी रोजी एन.ई.एम.एस शाळेत प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका कांचन बदामीकर तसेच शाळेचे शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी उपस्थित होते.
आपल्या भाषणात व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कांचन बदामीकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षणासोबत कौशल्य विकास आणि उद्योजकतेकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि चित्तथरारक पिरॅमिड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले.
इयत्ता सातवी मध्ये शिकणारी कुमारी आस्था अब्रोल हिने मराठी भाषिक नसून सुद्धा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमधून अतिशय प्रभावीपणे भाषण केले. याचे सर्वत्र कौतुक झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या शिक्षकवृंदाने आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् गीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा पोळेकर आणि नीरजा बेलसरे यांनी प्रभावीपणे केले.